आखाती समस्या आणि आपण...!
आखातामधील युद्ध सुरु झाल्यानंतर आपणासमोर इंधन संकट उभं राहिलं. देशांत आपण ऊर्जेचा वापर करतो त्यात सर्वाधिक वापर हा पेट्रोलियम उत्पादनांचा आहे आणि याबाबतीत आपण स्वयंपूर्ण नाहीत. आपल्या देशाची आधिकाधिक विदेशी मुद्रा इंधन खरेदीसाठी वापरली जात आहे. या पार्श्वभूमीवर इंधन वाचवण्याचा सल्ला देत आपण काही प्रमाणात या खर्चात बचत केली असली तरी या सर्वांचा एकत्रित परिणाम आपणास महागाईच्या रुपाने सहन करावा लागत आहे.
केवळ पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी याचाच विचार न करता आगामी काळात एकूणच ऊर्जावापर धोरण देशपातळीवरच नव्हे तर आपणास आपला घराच्या पातळीपर्यंत करण्याची वेळ आज आली आहे.
घरात गॅसच्या वापरासोबत आपण विजेचा वापर करतो या विजेच्या निर्मितीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपण आजही जिवाश्म (कोळसा इंधनावर) अवलंबून आहे. येणाऱ्या काळात सूपर एल निनोचे संकट आपल्या समोर आहे. हे संकट जीवनाच्या सर्वच बाजूंनी आपली परिक्षा घेणारे ठरणार आहे.
सूपर एल निनोमुळे पृथ्वीच्या तापमानात २ अंश सेल्सीअसची वाढ होईल असा अंदाज आहे. यामुळे आपला मौसमी पावसाच्या देशात पावसाचे प्रमाण कमी राहणार हे स्पष्ट झाले आहे. याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर होणार आहे.
सध्या हवामान मोजताना आपण वेधशाळेचे आकडे बघतो ते ४३-४४ अंश आणि त्याच्या आसपास आहेत. प्रत्यक्षात संरक्षित जागेत मोजलेले हे तापमान हवामान काय सांगत आहे याचा एक पुरावा असतो.
मोठ्या प्रमाणावर झालेल्या शहरीकरणामुळे ऊंच सिमेंटच्या इमारतीचं जंगल आणि त्यात सिमेंट किंवा डांबरी रस्ते अशा वातावरणात दृश्य तापमान ४५ अंश असले तरी पृष्ठभागीय (Surface Temperature) तापमान ५० अंशांपर्यंत वाढलेले असल्याने शहरी भागात उन्हाळा अधिक जाणवतो आणि हे सर्व पृष्ठभाग थंड लवकर होत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या तापमानात देखील आपणास उष्णता जाणवत राहते
उष्णतेपासून बचाव अर्थात पंखे, कुलर आणि ए.सी. यांचा वाढलेला वापर ज्याचा ताण मग वीज निर्मितीवर होतो आणि मग अनेक भागात लोडशेडींग आणि उष्णता असा दुहेरी त्रास जाणवत असतो
आपल्याकडे उन्हाळ्यात विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये गेल्या 2 वर्षात तफावत वाढताना दिसत आहे. वीज निर्मिती केंद्रांवरील ताण वाढत आहे. याला पर्याची ऊर्जा माधन मृणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि जलविद्युत त्यात देश वेगाने वाटचाल करीत आहे. तथापि मागणी सातत्याने वाढत राहिल्यामुळे ही स्थिती कायमच आहे. एल-निनोच्या काळात हे संकट अधिक गहिरे होणार आहे.
आखाती युद्ध एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला सूपर एल-निनो चे घोंघावणारे संकट या पार्श्वभूमीवर शासन उपाय योजना करीतच आहे परंतु आपण देखील आपली जबाबदारी ओळखून यात योगदान देणे आवश्यक आहे
सार्वजनिक वाहन प्रणालीचा वापर वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना संकटानंतर प्रत्येकाने सुरक्षा म्हणून स्वतःचे वाहन वापरणे सुरु केले यामुळे इंधन संकटासोबत पर्यावरण प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, ध्वनी प्रदूषण आणि रस्ते अपघात असे नवे दुष्टचक्र आता समोर येत आहे
सौर ऊर्जेच्या वापरातून आपण स्वत:च्या गरजेपुरती ऊर्जा किंवा त्यातील निम्मा वाटा प्रधानमंत्री सूर्यघर सारख्या योजनांमधून उचलू शकतो. पेट्रोलियम खर्चात कपात करण्यासाठी आता इलेक्ट्रीक आणि सीएनजी वर चालणारी वाहने बाजारात आली आहेत आणि त्याला चांगला प्रतिसाद दिसत आहे. असे असले तरी आगामी काळात याला अधिक गती देण्याची गरज आहे
देशातील अग्रगण्य कंपनीने नुकतीच E-85 वाहन मालिका सादर केली आहे. आपण सध्या E-20 इंधन अर्थात 20 टक्के इथेनॉल मिश्रीत पेट्रोत वापरत आहोत. E-85 आगामी काळात वापरायची तयारी करावी लागणार आहे. या E-85 मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे आणि आगामी काळ E-30, E-50 व E-85 वाहनांचा होईल हे नकी यातून पर्यावरण रक्षणाला देखील हातभार लागणार आहे.
आपला या आसेतू हिमाचल देशात विविध प्रांतात विविध भौगोलिक रचना आणि आव्हाने आहेत. त्यात अडकून न पडता आपण या क्षमतेच्या निराकरणात अल्पसा वाटा उचलला तरी येणाऱ्या संकटाचे गांभीर्य कमी करता येईल. याबाबत प्रत्येकाने जरूर विचार करावा.
प्रशांत दैठणकर.





