पूर अतिवृष्टीबाबत नागरिकांनी सतर्क राहण्याच्या महापालिकेच्या सूचना।
कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज मा.महापौर व आयुक्त यांनी घेतलाकक्षाचा आढावा।
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील व शहर परिसरातील नागरिकांना पूर /अतिवृष्टी बाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आज दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पावसाचे पाणी साचले.यामुळे काही ठिकाणी झाड कोसळणे ,पावसाचे पाणी साचणे अशा तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या त्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली.
यात विवेकानंद कॉलेज मागे एक वृक्ष उन्मळून पडले.यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.या ठिकाणी तत्काळ कारवाई करण्यात येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.
तसेच विजय नगर येथील जय दुर्गा सोसायटी येथे अंडर ग्राउंड मध्ये पाणी तुंबले, न्यू हनुमान नगर येथे अष्टविनायक मंदिर जवळ घरात पाणी साचले,उल्कानगरी अगस्ती होम समोर रस्त्यावर पाणी साचले व सिडको कम्युनिटी हॉल एन ०३ येथे हॉस्पिटलच्या अंडर ग्राउंड मध्ये पाणी साचले अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तात्काळ या ठिकाणी अग्निशमन विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी धाव घेऊन तक्रारींचे निवारण केले.
आज साधारणत ३६.०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली.
मां.महापौर व आयुक्त यांनी दिली आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट
मा.महापौर श्री समीर राजुरकर ,आयुक्त अमोल येडगे यांनी आज आपत्ती व्यवस्थापन कक्ष याठिकाणी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी उप आयुक्त तथा आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख अंकुश पांढरे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष प्रमुख स्वप्नील सरदार यांची उपस्थिती होती.
मां. महापौर व मां.आयुक्त महोदय यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी महानगरपालिका आपत्ती नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक ०२४०- २६१७१६५/२६१७१६६
अग्निशमन नियंत्रण कक्ष
संपर्क क्रमांक ०२४०-२३३४०००
व्हॉट्स अप नंबर
९८२३२७०७८२
जारी करण्यात आला आहे.या संपर्क क्रमांकावर नागरिक संपर्क साधून पूर परिस्थिती किंवा धोकादायक परिस्थितीत आपला बचाव करू शकतात.
महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.
यात
नागरिकांनी मुसळधार पावसाच्या वेळी नदी ,नाले, पुल,सखल भाग व पाणी साचणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे.
पाण्याचा वेग जास्त असलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविणे टाळावे.
घराजवळील नाले गटारे व पाण्याचा प्रवाह अर्धा मुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे.
पावसाच्या काळात विद्युत खांब तुटलेल्या तारा उघडी विद्युत उपकरणे यापासून सुरक्षित अंतर ठेवावे.
अफवा व अप्रमाणित संदेशावर विश्वास ठेवू नये. अधिकृत प्रशासनिक सूचनांचे पालन करावे.
घरात पाणी शिरण्याची शक्यता असल्यास महत्त्वाची कागदपत्रे औषधे व आवश्यक साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
आपत्कालीन परिस्थितीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी. तसेच नदी अथवा नाले यांच्या जवळ जाणे टाळावे.
तसेच काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वर नमूद संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.





