पाणीनियोजनामध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा – डॉ. अशोक तेजनकर

पाणीनियोजनामध्ये महिलांचा सहभाग महत्त्वाचा – डॉ. अशोक तेजनकर

छत्रपती संभाजीनगर – आज दिनांक २३ मार्च रोजी मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग आणि जिओफोरम  (असोसिएशन ऑफ जिओलॉजिस्ट्स अँड हायड्रोजिओलॉजिस्ट्स)  यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक जल दिन २०२६’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी संयुक्त राष्ट्रांनी “जलसंधारण आणि लिंगसमता (Water and Gender)” ही संकल्पना दिली आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमास भूजल तज्ज्ञ, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत अवसरमल यांनी केले. त्यांनी जलसंधारणासोबत लिंगसमतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कौसल्या कुलकर्णी यांनी प्रभावीपणे केले. प्रमुख वक्ते म्हणून भूजल तज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर (माजी प्राचार्य, देवगिरी महाविद्यालय व अध्यक्ष, जिओफोरम, छत्रपती संभाजीनगर) यांनी “Water and Gender” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, त्या भागात आर्थिक समानता साध्य होण्यास मदत होते. भूजल उपलब्ध असलेल्या प्रदेशांमध्ये शेती आणि आर्थिक विकास चांगला झालेला दिसतो, तर पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकास ठप्प झालेला आढळतो. अशा भागांसाठी शासनाने विशेष योजना राबवून आर्थिक समानता साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. घरगुती वापर तसेच शेतीतील पाण्याच्या वापरात महिलांचा मोठा सहभाग असतो. पाणीटंचाईची झळ सर्वप्रथम महिलांनाच बसते. अनेक ग्रामीण भागात आजही महिलांना उन्हाळ्यात १ ते २ किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. त्यामुळे महिलांना पाण्याचे महत्त्व आणि नियोजनाची जाणीव अधिक असते. महिलांचे नेतृत्व पुढे आल्यास पाणीनियोजन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पी. एस. कुलकर्णी होते. त्यांनी जलसंधारण ही सामाजिक जबाबदारी असल्याचे सांगत सर्वांनी पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास डॉ. मनीष दीक्षित, डॉ. कैलास आहेर, डॉ. पी. एल. साळवे, डॉ. मेघा देशमुख,  डॉ. प्रमोद बी. पाथ्रीकर, डॉ. शशिकांत टी. बोंदलेकर, डॉ. के. एम. वांजरेवाडकर, श्री. मेश्राम बी. एस. (भूगर्भशास्त्रज्ञ), श्री. गिरीश महाजन (भूगर्भशास्त्रज्ञ), श्री. संजय एस. पाटील (सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ), श्री. इरशाद एस. शेख (भूभौतिकी तज्ञ), डॉ. भाग्यश्री डी. लांजेवार, प्रा. वाय. डी. शेरमाळे, प्रा. आर. एन. चाटोरीकर, श्री. अजय रत्नपारखी, रुपेश आहेर, सुशील खरात  आणि गणेश राऊत यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान तांत्रिक संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे जलसंधारण आणि लिंगसमता याबाबत व्यापक जनजागृती झाली असून विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला